मराठी भाषेने वेळोवेळी झालेले बदल स्वीकारले आहेत ती परिवर्तनशील आहे. परंतु तिला स्वताचा एक स्वभाव आहे. एक व्यक्तित्व आहे. स्वताचे चरित्र आहे. मराठी भाषेमध्ये जे सांस्कृतिक संचित आहे. असे सांस्कृतिक संचित जगातल्या दुसऱ्या कोणत्याही भाषेत नाही. म्हणून मराठीही सांस्कृतिक संचिताची भाषा आहे म्हणून मराठी भाषा ही ज्ञान भाषा झाली पाहिजे. असे मत प्रा.डॉ. कालिदास गुडदे यांनी व्यक्त केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा कार्यक्रमात मराठी भाषेचे संवर्धन या विषावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. रेणुकादास बोन्नर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. कालिदास गुडदे, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ.संतोष हंकारे हे उपस्थितीत होते. मान्यवरांच्या हस्ते कर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. या वेळी डॉ. गुडदे बोलताना म्हणाले,'' मराठी भाषेतले शब्द जोपर्यंत संपणार नाहीत तो पर्यंत भाषा मरनार नाही.शब्दामुळे भाषा तयार होते. शब्दच भाषेची वाहक असतात. त्यासाठी नवे नवे शब्द शोधले पाहिजे.त्यासाठी मराठी भाषेतील लयास गेलेल्या शब्दाचा शब्दकोश तयार केला पाहिजे.
शब्द कमी झाले की भाषा नष्ट होते.ग्रंथ वाचल्याशिवाय शब्द संवर्धन वाढत नाही.त्यासाठी शब्दधन वाढवायचे असेल तर ग्रंथाचे महत्व जाणून आपण ग्रंथ वाचन केले पाहिजे. नवे शब्द तयार करा मराठी भाषा कधीच मरणार नाही. तुकारामांनी व ज्ञानेश्वरानी मराठी भाषा समृद्ध केली.ती परंपरा आपण टिकवली पाहिजे. तसेच मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतील लोप पावलेल्या शब्दांचा संग्रह करावा. या शब्द संग्रहाचा मराठी विभागाच्या वतीने शब्दकोश तयार करण्यात येईल असे आव्हान मराठी विभाग प्रमुख डॉ.संतोष हंकारे यांनी केले. तर अध्यक्ष समारोप करताना प्रा. डॉ. रेणुकादास बोन्नर यांनी मराठी भाषा टिकवायची असेल तर मराठी भाषेत नव नवे संशोधन झाले पाहिजे. या संशोधनातून स्वताची साधने निर्माण होतील त्यातूनच नवीन शब्दाचा उगम होईल असे सांगितले.या प्रसंगी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या 'माय मराठी' या भित्तीपत्रकाचे विमोचन प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. श्रीहरी चव्हाण यांनी केले.तर सूत्रसंचालन हनुमान दळणर यांनी केले.

